"वासुदेव उवाच"
"ज्याला वरदान द्यायचा अधिकार आहे अशा व्यक्तीने केलेल्या प्रार्थनेलाच खरं मोल असतं."
कोणत्याही सुखासाठी आसावलेला मनुष्य अध्यात्माकडे वळू शकत नाही, हे सत्य आहे. कारण त्या सुखाचा अभाव त्याच्या वैराग्यासाठी साधक ठरतोच असं नाही, उलट बहुतांशी वेळेला तो बाधकच ठरण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी लवकरात लवकर त्याची पूर्वकर्मं धुतली जाणं आणि त्याच्या त्या अडचणींचं निवारण होऊन त्याच्या आध्यात्मिक वाटेवरचा तो अडथळा दूर होणं जास्त महत्त्वाचं असतं. ह्यासाठी अत्यंत प्राचीन काळापासून मंत्रशास्त्राचा वापर केला गेला आहे. तसाच अर्वाचीन काळातला प्रभावी प्रयत्न श्रीस्वामीमहाराजांनी मंत्रात्मकश्लोकांची रचना करून साधलेला आहे.
                          – प. पू. सद्गुरु श्री बापट गुरुजी

श्री स्वामी महाराजांनी गरजू आणि पीडितांसाठी वेळोवेळी दु:खशमनार्थ विविध मंत्र रचून दिले. समाजाला आधारभूत ठरलेल्या त्या संस्कृत श्लोकबद्ध मंत्रगर्भरचनांचे संकलन म्हणजेच ‘मंत्रात्मक श्लोक’. हे सलग स्तोत्र नसून बारा प्रकारच्या मंत्रांचे एकत्रीकरण आहे. ह्या स्तोत्रात लौकिक आणि पारलौकिक इच्छापूर्तीसाठी वेगवेगळे मंत्र दिले आहेत. ह्या मंत्रांमध्ये संकटनिवारण, दारिद्र्यनाश, संतानवृद्धी, पिशाच्चपीडा नाश, आरोग्यवृद्धी, अनैसर्गिक मृत्यूपासून बचाव व सौभाग्यप्राप्ती, पापनाश, शांतीप्राप्ती, समाज ऋण व पितृऋणातून मुक्ती, ज्ञानप्राप्ती, सर्व इच्छापूर्ती आणि सरतेशेवटी मनुष्याच्या अंतिम प्रगतीसाठी आवश्यक असलेला संपूर्ण शरणागतीचा बारावा मंत्र अंतर्भूत आहे. हे सर्व मंत्र स्वयंसिद्ध असून त्यात स्वामी महाराजांनी त्यांची शक्तीही प्रोक्षित केली आहे.या ग्रंथामध्ये प्रत्येक श्लोकाचा अर्थ, त्याची उपयोगिता, मंत्रानुष्ठानाचा कालावधी, नैवेद्य, तसेच मंत्र सिद्ध करण्यासाठी कोणत्या पूर्वअटींचं पालन जापकाकडून होणं गरजेचं आहे, इ. अनेक बाबींचा सखोल परामर्श सद्गुरु श्री बापट गुरुजींनी घेतला आहे. ह्यातील प्रत्येक सिद्धमंत्राला पूरक ठरतील अशी यंत्रंही श्री सद्गुरुंनी ह्या ग्रंथामध्ये सुचवलेली आहेत आणि प्रत्येक यंत्रांकृतींबद्दल माहितीचा समावेशही केला आहे.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&BookType=1